शुक्रवार, १७ मार्च, २०१७

गारपिटग्रस्त भागाची केली पाहणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निश्चितपणे मदत करण्याची शासनाची भूमिका - पालकमंत्री पंकजा मुंडे








           
            बीड, दि. 17 :- बीड जिल्हयातील काही भागात गारपिट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश देत पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन सर्वोतोपरी मदत करण्याची नि:संदिग्ध्‍ा ग्वाही दिली.
            परळी आणि केज तालुक्यातील गारपिट आणि अवकाळी पावसामुळे बाधित भागाचा दौरा करुन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेवून नुकसानीची आज पाहणी केली. परळी तालुक्यातील हिवरा, गोवर्धन, खारी तांडा, पिंपरी ब्रु, आदि गावांना बुधवारी झालेल्या गारपिटीचा व वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला. या गावातील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले शाळा इमारत, विजेचे खांब आणि झाडे तसेच काही घरांचे मोठे नुकसान झाले आहे. आज पालकमंत्री मुंडे यांनी या भागाची पाहणी करुन शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिले. घराची पत्रे उडाल्याने बेघर झालेल्या कुटूंबाला खावटीतून तात्काळ मदत देण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या सभागृहात झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी सविस्तर आढावा घेतला.
            काही शाळाच्या इमारतीचे नुकसान झाल्याची बाब लक्षात आणून देत पालकमंत्री मुंडे यांनी शाळा दुरुस्तीचे प्रस्ताव तात्काळ तयार करुन शासनास पाठविण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांना दिले. महावितरणने विजेची व्यवस्था खंडीत झाली असल्यास तात्काळ दुरुस्ती करण्याचे निर्देशही देण्यात आले.
            नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाने सुरु केले असले तरी ते अधिक वेगाने पुर्ण करुन अहवाल शासनाकडे पाठविण्याची सुचना करुन पालकमंत्री मुंडे यांनी विशेषत: कापसाच्या नुकसानीचे स्वतंत्र पंचनामे करुन अहवाल करण्याबाबत मार्गदर्शन केले. कृषी विभागाकडून यावेळी जिल्हयातील नुकसानीची प्राथमिक माहिती घेवून पालकमंत्री मुंडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पावसामुळे नादुरुस्त पुल व रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देण्याचे निर्देश दिले.
कुटूंबियांना आर्थिक मदत
बुधवारी विज पडून मृत्यू पावलेल्या परळी तालुक्यातील शेतकरी आश्रोबा किसन गायकवाड आणि शेतमजूर सुशीलाबाई तुळशीराम कुंभार यांच्या घरी जाऊन पालकमंत्री मुंडे यांनी त्यांच्या कुटूंबियांचे सात्वन केले. यावेळी शासनाच्या वतीने त्यांना प्रत्येकी 4 लाख रुपयांचे धनादेश देवून कुटूंबियांना दिलासा दिला तसेच गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत लाभ देण्याचे सुचना केली.
            नेहमी विज पडण्याच्या घटना होत असल्यामुळे अशा गावांच्या परिसरात विज प्रतिबंधक यंत्राणा स्थापित करण्याचे निर्देश देत यासाठी जिल्हा नियोजन आराखड्यातून तरतूद उपलब्ध करुन देण्यात येईल अशी घोषणा पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केली.
            केज तालुक्यातील येवता येथील शुभम सटवा निर्मळ (वय 15 वर्षे) यांचेही विज पडल्यामुळे बुधवारी निधन झाले होते. त्याच्या घरी जावून पालकमंत्री मुंडे यांनी 2 लाख रुपयांचा धनादेश त्याच्या कुटूंबियाकडे सुर्पूद केला.

            या दौऱ्यात पालकमंत्री मुंडे यांच्यासमवेत जिल्हाधिकारी नवल किशोर राम, मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, सहायक जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रमेश भताने, अप्पर जिल्हाधिकारी राम गगरानी आदि विभागप्रमुख तसेच पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा