बीड,
दि. 16 :- नैसर्गिक संकटाच्या काळातही शासन
सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी असून गारपीट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे झालेल्या
नुकसानीविषयी शासन गंभीर असल्याचे प्रतिपादन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.
बीड जिल्ह्यातील काही भागात गारपीट आणि वादळी
वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे बुधवारी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले या पार्श्वभूमीवर
राज्यमंत्री खोत यांनी परळी आणि केज तालुक्याचा दौरा करुन नुकसानीची पाहणी केली. यावेळी
ते बोलत होते.
परळी तालुक्यातील कौठळी येथील विज पडून मृत्यू
पावलेल्या आश्रोबा किसन गायकवाड आणि सुशीलाबाई तुळशीराम कुंभार यांच्या घरी जाऊन राज्यमंत्री
खोत यांनी त्यांच्या कुटूंबियांचे सात्वन केले.
कौठळी येथील नुकसान झालेल्या पिकाची पाहणी
करुन राज्यमंत्री खोत यांनी राज्य शासनाने सर्व यंत्रणांना सखोल पंचनामे करुन अहवाल
पाठविण्याचे निर्देश दिले असल्याचे सांगून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन दिलासा देईल
असे स्पष्ट केले. त्यानंतर त्यांनी केज तालुक्यातील तलवाडा येथेही भेट दिली.
यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा अधिक्षक कृषी
अधिकारी रमेश भताने, तहसीलदार विद्याचरण कडवकर तसेच पदाधिकारी व अधिकारी, कर्मचारी
उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा