शासनाच्या विविध विकासात्मक योजनांची
जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी
- पालकमंत्री
श्रीमती पंकजा मुंडे
पालकमंत्र्याच्या हस्ते वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या
गळीत हंगामाचा शुभारंभ
बीड, दि. 26 :- जिल्ह्याच्या
सर्वांगिण विकासासाठी शासनाच्या विविध योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत.
त्याच बरोबर प्रत्येक गावाचा विकास झाला पाहिजे यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीचा विकासाचा
आराखडा तयार करण्यात येणार असून त्या ग्रामपंचायतींना भरपूर निधी उपलब्ध करुन देण्यात
येणार असल्याचे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या
पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी केले.
पांगरी येथील वैद्यनाथ
सहकारी साखर कारखान्याच्या अठराव्या गळीत हंगामाचे शुभारंभ पालकमंत्री पंकजा मुंडे
यांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी आमदार विनायक मेटे होते तर आमदार आर.टी.देशमुख, आमदार लक्ष्मण पवार, आमदार संगिता ठोंबरे, जि.प.अध्यक्षा सविता
गोल्हार, कारखाण्याच्या संचालक यशश्री मुंडे, कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेव आघाव, कृषी
मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, माजी आमदार केशवराव आंधळे, जि.प.सभापती युध्दजित
पंडित, संतोष हंगे, फुलचंद कराड, रमेश आडसकर, रमेश पोकळे, यांची व्यासपिठावर प्रमुख
उपस्थिती होती.
पुढे बोलतांना पालकमंत्री
श्रीमती मुंडे म्हणाल्या की, जिल्ह्याच्या विकासासाठी विविध विकासाच्या योजना राबविण्यात
येत असून येणाऱ्या काळात गावाचा विकास व्हावा यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीचे विकास
आराखडे तयार करण्यात येणार असून त्या सर्व ग्रामपंचायतींना भरपूर निधी देण्यात येणार
आहे. नव्याने निवडूण आलेल्या सर्व सरपंच व सदस्यांनी या निधीचा चांगला उपयोग करुन घेतला पाहीजे व आपल्या गावाचा विकास केला पाहिजे. वैद्यनाथ
सहकारी साखर कारखान्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या जीवनात मोठा बदल आला असून या कारखान्यामुळे
शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती झाली आहे. वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना नेहमी प्रत्येक
गोष्टीत अग्रेसर राहिला आहे. या कारखान्याने मागील काळात विक्रमी गाळप करुन उच्चांक
गाठला होता. तसेच जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यापेक्षा शेतकऱ्यांच्या ऊसाला जादा भाव
दिला आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी समाधानी आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व पदाधिकाऱ्यांनी
यावर्षी गाळपाचे उदिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असेही त्यांनी यावेळी
सांगितले.
जिल्ह्यात यावर्षी
चांगला पाऊस झाला असून पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यामुळे ऊस लागवडीचे
क्षेत्र वाढण्यास मदत झाली आहे. त्यामुळे कारखाना पुढील वर्षी चालू राहण्यास मदत होणार
असल्याचे सांगून जिल्ह्यातून 8 राष्ट्रीय महामार्ग जात असून त्याची कामे प्रगती पथावर
आहेत. परळी मतदार संघात शंभर कि.मी.चे रस्ते मंजूर झाले असून येणाऱ्या काळात रस्त्याचे
कामे एकही शिल्लक राहणार नाहीत. तसेच विविध विकास कामाच्या माध्यमातून परळी मतदार संघासह
जिल्ह्याचे नाव लौकीक वाढविण्यासाठी योगदान देणार आहे असेही पालकमंत्री मुंडे यांनी
यावेळी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात
आमदार विनायक मेटे म्हणाले की, जिल्ह्यात सहकार चळवळ निर्माण करण्याचे काम स्व.गोपिनाथराव
मुंडे यांनी केले आहे त्यांच्याच प्रयत्नातून पांगरी येथील साखर कारखान्याची उभारणी
पूर्ण झाली आहे. या कारखान्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना चांगली मदत झाली आहे असे
सांगून या कारखान्याने यावर्षीचे गाळपाचे उदिष्ट पूर्ण करणार असेही त्यांनी यावेळी
सांगितले.
यावेळी आमदार संगिता
ठोंबरे, आ.लक्ष्मण पवार, आ.आर.टी.देशमुख, कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, फुलचंद
कराड, माजी आमदार केशवराव आंधळे, गणेश हके, रमेश पोकळे, रमेश आडसकर यांचीही समयोचित
भाषणे झाली.
प्रारंभी पालकमंत्री
पंकजा मुंडे व इतर मान्यवरांच्या हस्ते ऊसाची मोळी टाकून वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना
अठराव्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे
उपाध्यक्ष नामदेव आघाव यांनी केले.
या कार्यक्रमास जिवराज
ढाकणे, शिवाजीराव गुट्टे, राजाभाऊ मुंडे, श्रीहरी मुंडे, आदित्य सारडा, जुगलकिशोर लोहिया
यांच्यासह पदाधिकारी, कारखान्याचे संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी, शेतकरी मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
-*-*-*-*-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा