गुरुवार, १३ एप्रिल, २०१७

उष्माघातापासून बचाव करण्यासाठी नागरिकांना जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शक सुचना



               बीड, दि.13 :- मागील वर्षीपेक्षा या वर्षी उन्हाळ्याची सुरुवात लवकर झाली आहे तसेच मागील 2-3 वर्षापासून जिल्ह्यात व मराठवाड्यामध्ये मार्च ते मे या महिन्यात वातावरणातील तापमानामध्ये प्रचंड वाढ होत असल्यामुळे उष्माघात होऊन जिवित हानी होऊ शकते. यामुळे उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काय करावे व काय करु नये याबाबतच्या मार्गदर्शक सुचना जिल्हा प्रशासनाने दिल्या असून त्याचे पालन करावे. उष्णतेच्या लाटेमुळे शारिरीक ताण पडून मृत्यू होण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात यावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
          उन्हाळ्यात काय करावे- तहान लागलेली नसली तरीसुध्दा जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे. हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.  बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी,बुट व चपलाचा वापर करण्यात यावा. प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत घ्यावी. उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करण्यात यावा तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकण्यात यावा. शरिरातील पाण्याचा प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी,तोरणी,लिंबू-पाणी, ताक इत्यादीचा नियमित वापर करण्यात यावा. अशक्तपणा, स्थुलपणा, डोकेदुखी, सतत येणार घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा. गुरांना छावणीत ठेवण्यात यावे तसेच त्यांना पुरेशे पिण्याचे पाणी द्यावे. घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात. पंखे, ओले कपडे यांचा वापर करण्यात यावा तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था  करण्यात यावी. सुर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सुचित करण्यात याव. बाहेर कामकाज करीत असताना मध्ये मध्ये घेऊन नियमित आराम करण्यात यावा. गरोदर कामगार व आजारी कामगारांची अधिकची काळजी घेण्यात यावी. रस्त्याच्याकडेला उन्हापासून संरक्षणाकरीता शेड उभारावेत.जागोजागी पाणपोईची सुविधा करण्यात यावी. 
          उन्हाळ्यात काय करु नये- लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. दुपारी 12 ते 3.30 या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. बाहेर तापमान अधिक असल्यास शारिरीक श्रमाची कामे टाळावीत, दुपारी 12 ते 3.30 या कालावधीत बाहेर काम करणे टाळावे. उन्हाच्या कालावधीमध्ये स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावीत. असे जिल्हाधिकारी, बीड यांनी कळविले आहे.
-*-*-*-*-



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा