गुरुवार, ९ मार्च, २०१७

माता मृत्यू आणि रक्तक्षयरोगाला आळा बसविण्यासाठी सकस आहार, स्वच्छतेबरोबरच शौचालयाची आवश्यकता - जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदिप सांगळे





माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्यावतीने पिंपळनेर येथे प्रजनन,माता-बालसंगोपन व किशोरवयीन मुलांचे आरोग्य जनजागृती अभियान संपन्न
माता मृत्यू आणि रक्तक्षयरोगाला आळा बसविण्यासाठी
सकस आहार, स्वच्छतेबरोबरच शौचालयाची आवश्यकता
                                                                           - जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदिप सांगळे

बीड, दि. 9:- जिल्ह्यातील माता मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी गरोदरपणात काळजी, वेळेवर मातेला सकस आहार आणि उपचाराबरोबरच स्वच्छता महत्वाची असल्याने घरात शौचालय असणे आवश्यक आहे. तसेच जिल्ह्यात निम्याहून अधिक महिलांना रक्तक्षय रोगाने ग्रासलेल्या आहे त्यांना सकस आहाराबरोबरच वेळेवर तपासणी करुन उपचार करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदिप सांगळे यांनी केले.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे क्षेत्रीय प्रचार संचालनालय व राज्य सरकारच्यावतीने बीड जिल्ह्यातल्या बीड तालुक्यातील पिंपळनेर येथे दोन दिवसीय (दि.8 व 9 मार्च 2017) प्रजनन,माता-बाळ आरोग्य आणि किशोरवयीन मुलांचे आरोग्यजनजागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागेश चव्हाण, मा.जिल्हा परिषद सदस्य  मनोज पाटील, जिल्हा साथरोग अधिकारी पुरुषोत्तम पिंगळे, जिल्हा आयुष अधिकारी डॉ.मिथून पवार, राष्ट्रीय किशोरी आरोग्य कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक डॉ.संतोष हरणमारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नरेश कासट, वैद्यकिय अधिकारी डॉ.मिर्झा बेग, डॉ.दशरथ चौरे, गावच्या महिला सरपंच चंद्रभागा गणगे, जिल्हा परिषद कन्या प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.कानडे, जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.तौर, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, आरोग्य  तसेच महिला बाल विकास विभागाचे कर्मचारी, आशा, अंगणवाडी कार्यकर्त्या  आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी श्री.सांगळे म्हणाले की, जिल्ह्यात गरोदरपणा व बाळंतपणातील आजारामुळे दरवर्षी जवळपास 20 मातांचा मृत्यू होतो हा मृत्यू टाळण्यासाठी तीन आठवड्याच्या आत गरोदर मातेची नोंदणी करुन वेळेवर तपासण्या, निदान आणि उपचार करुन वेळेवर सकस आहार दिल्यास त्यानंतर प्रसुती रुग्णालयातच केल्यास मातेचा मृत्यू टाळता येतो असे ते म्हणाले. जिल्ह्यातील 56 ते 60 टक्के मुलींमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण असून यासाठी लोहयुक्त गोळ्या घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागेश चव्हाण यांनी  वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत लसीकरण करुन घेणे आणि सर्वांनी स्वच्छता बाळगल्यास साथीच्या रोगापासून आळा बसण्यास निश्चीतच मदत होईल असे ते म्हणाले. निम्म्याहून अधिक आजार अच्छतेमुळे होतात असेही ते म्हणाले. डॉ.हरणमारे यांनी किशोरवयीन मुलां-मुलींच्या आरोग्याविषयी माहिती दिली तर माजी जिल्हा परिषद सदस्य संदिप पाटील यांनी सर्वांना आरोग्याची माहिती असणे गरजेचे असून रुग्णालयामध्ये जाण्याची वेळ येवू नये यासाठी स्वच्छतेबरोबरच दैनंदिन सवयीतही सुधारणा करण्याचे आवाहन त्यांनी गावकऱ्यांना केले.
यावेळी सकस आहार, रांगोळी आणि सुदृढ बालक स्पर्धा तसेच प्रश्न मंजूषा घेऊन विजेत्या स्पर्धकांना पारितोषिकांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आज सकाळी पिंपळनेर गावातून जनजागरण रॅली काढून आरोग्याचा संदेश देण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद कन्या शाळा आणि जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, आशा, अंगणवाडी कार्यकर्त्या  तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
कायर्क्रमाचे प्रस्ताविक क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये यांनी केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकार राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती देवून या कार्यक्रमाचा उद्देश विशद केला, कार्यक्रमाची सर्व जबाबदारी क्षेत्रीय प्रचार सहायक सदाशिव मलखेडकर यांनी सांभाळली. 

-*-*-*-*-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा