शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०१६

लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान
गणेशोत्सवातील देखावा स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील
जास्तीत जास्त गणेश मंडळांनी सहभागी व्हावे
समिती सदस्य बसवराज मंगरुळे यांचे आवाहन
                       
            बीड, दि. 19 :- " लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान" आणि " लोकमान्य उत्सव " या उपक्रमाअंतर्गतच्या सामाजिक जनजागृतीपर देखावा स्पर्धेमध्ये  जिल्ह्यातील जास्तीत जास्त गणेश मंडळांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन शासनाच्या लोकमान्य महोत्सव समितीचे सदस्य बसवराज मंगरुळे यांनी केले.
            जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात लोकमान्य महोत्सव समितीच्या बैठकीत मागदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अनिल पवार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, औरंगाबाद येथील  नगरसेवक नितीन चिकटे, शिक्षणाधिकारी (मा.) श्री. हिंगोणीकर, उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, जिल्हा विशेष शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही.एम. मेत्रेवार यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी पुढे बोलताना बसवराज मंगरुळे म्हणाले की, सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची यावर्षी 160 वी जयंती आहे. तर त्यांनी सुरु केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या चळवळीला पुढील वर्षी 125 वर्ष पूर्ण होत आहे. तसेच "स्वराज्य हा जन्मसिध्द अधिकार" आहे आणि तो मी मिळविणारच" या घोषणेच्या शताब्दी वर्षानिमित्त यानिमित्ताने शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने " लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान" आणि " लोकमान्य उत्सव" हे उपक्रम सन 2016 व 2017 या  वर्षात राबविण्यात येणार आहेत. यानिमित्ताने विविध विषयावरील जनजागृतीसाठी उत्कृष्ट देखावे सादर करण्यात येणाऱ्या गणेश मंडळांसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
            " लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान" हा उपक्रम यावर्षीच्या गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांनी लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेल्या स्वदेशी, साक्षरता, बेटी-बचाओ, व्यसनमुक्ती आणि जलसंवर्धन या पैकी एका कल्पनेशी निगडीत असलेल्या विषयावर देखावा करणे अपेक्षीत आहे. तसेच लोकमान्य टिळकांचे विचार, त्यांची चतु:श्रुती  तसेच अन्य उपक्रमांद्वारे जनजागृती घडवतील, हा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची स्पर्धा आयोजित करण्यामागील शासनाचा  उद्देश आहे.  तसेच लोकमान्य उत्सव साजरा करण्यामागील मुख्य उद्देश लोकमान्य टिळकांची जीवनगाथा, त्यांनी केलेल्या संघर्षाचा लढा विविध माध्यमांद्वारे नवीन पिढीपर्यंत पोहचविणे हा आहे.असेही श्री. मंगरुळे यांनी यावेळी सांगितले.
         स्पर्धेतील विजेत्या मंडळांना शासनामार्फत तालुकास्तरासाठी प्रथम पुरस्कार  25 हजार रुपये, द्वितिय 15 हजार रुपये आणि तृतीय पुरस्कार 10 हजार रुपये, तर जिल्हास्तरासाठी प्रथम पुरस्कार 1लाख रुपये, द्वितिय 75 हजार रुपये आणि तृतीय पुरस्कार 50 हजार रुपये आणि विभागस्तरावर प्रथम पुरस्कार 2 लाख रुपये, द्वितिय 1 लाख 50 हजार रुपये आणि तृतीय पुरस्कार 1 लाख रुपये याप्रमाणे रोख रकमेच्या स्वरुपात पुरस्कार देण्यात येणार आहेत अशी माहिती श्री. मंगरुळे यांनी यावेळी दिली.
            या स्पर्धेमध्ये राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येईल. त्याकरीता मंडळाची धर्मदाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेली असणे बंधनकारक आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी गणेश मंडळांनी विहीत नमुना-अ मध्ये संबंधित तालुक्याच्या गट शिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयात दिनांक 29 ऑगस्ट 2016  पर्यंत अर्ज दाखल करावेत असेही बसवराज मंगरुळे यांनी सांगितले.
            स्पर्धेत सहभागी झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची तपासणी व पारितोषिकासाठी निवड करण्यासाठी तालुकास्तरीय समिती, जिल्हास्तर समिती आणि विभागीय स्तर समिती अशा तीन समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या मंडळांच्या देखाव्यांची पाहणी करण्यासाठी तालुकास्तरावरील समिती दिनांक 8 ते 12 सप्टेंबर 2016 या कालावधीत प्रत्यक्ष भेट देतील. या पाहणीच्या वेळी शासनाने विहीत केलेल्या गुणांकन पध्दतीनुसार सार्वजनिक गणेश मंडळांना गुण देण्यात येतील.
            तालुकास्तरीय समितीद्वारे दिनांक 16 ते 18 सप्टेंबर 2016 या दरम्यान तालुकास्तरावरील विजेत्या गणेशोत्सव मंडळांची नांवे जाहीर करतील. जिल्हास्तरीय समिती दिनांक 22 सप्टेंबर 2016 रोजी जिल्हास्तरावरील विजेत्या गणेशोत्सव मंडळांची नांवे जाहिर करतील. तर विभागीय स्तर समिती दिनांक 25 सप्टेंबर 2016 रोजी महसूली विभागातील विजेत्या गणेशोत्सव मंडळांची नांवे जाहिर करतील असे सांगून जिल्ह्यातील जास्तीत जास्त सार्वजनिक गणेश मंडळांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन केले. या बैठकीस सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी, पोलीस तसेच विविध विभागाचे अधिकारी, जिल्हयातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते.

-*-*-*-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा