बुधवार, १० जून, २०२६
सारथी संस्थेच्या संशोधकांनी राबविली किल्ले धारूर येथे स्वच्छता मोहीम
बीड,दि.10 (जिमाका) :- राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या अर्थात सारथीच्या वतीने बीड जिल्ह्यातील ऐतिहासिक किल्ले धारूर येथे विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सारथीचे व्यवस्थापकीय संचालक महेश पाटील आणि उपव्यवस्थापकीय संचालक सुवर्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ६ आणि ८ जून २०२६ रोजी ही मोहीम पार पडली. या मोहिमेदरम्यान एकूण सहा पी.एच.डी. संशोधक विद्यार्थ्यांनी किल्ला परिसरातून सुमारे ८ किलो प्लास्टिक आणि इतर कचरा गोळा केला.
राजर्षी शाहू महाराजांची जयंती २६ जून रोजी असून, त्यानिमित्त सारथी संस्थेच्या वतीने २६ मे ते २५ जून २०२६ या कालावधीत विविध सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून १ ते ७ जून दरम्यान अधिछात्रवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या माध्यमातून नजीकच्या गड-किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. धारूर किल्ल्यावर सकाळी ६ ते १० या वेळेत ही मोहीम राबविण्यात आली. यात विद्यार्थ्यांनी किल्ला आणि परिसर पिंजून काढत ४ गोणी कचरा गोळा केला. यामध्ये प्रामुख्याने प्लास्टिकच्या पिशव्या, पाण्याच्या बाटल्या आणि इतर टाकाऊ वस्तूंचा समावेश होता. संकलित केलेला सर्व कचरा धारूर प्रशासनाच्या सहकार्याने योग्य पद्धतीने नष्ट करण्यात आला.
या मोहिमेत सारथी संस्थेच्या ६ पी.एच.डी. संशोधक विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. या मोहिमेचे नेतृत्व गटप्रमुख रामेश्वर झोडगे आणि गटप्रमुख वैशाली घोलप यांनी केले. त्यांच्यासह इतर सदस्यांनी दिलेल्या योगदानामुळे ही मोहीम यशस्वीरित्या पार पडली. असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
_*_*_*_*_
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा