शुक्रवार, १७ नोव्हेंबर, २०१७

प्रत्येकाने आपले मन वाचनाकडे वळवून ज्ञानाने समृध्द व्हावे - जि.प.अध्यक्षा सविता गोल्हार







            बीड, दि.17:- सध्याच्या वैज्ञानिक युगात मुलांमध्ये व्हॉटसअप, फेसबुक यासारख्या सोशल मीडियाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढल्याने वाचन संस्कृती लोप पावत आहे. यामुळे आपल्या संस्कृतीचा ठेवा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे देण्यासाठी ग्रंथ हेच गुरु आहेत. यामुळे प्रत्येकाने आपले मन वाचनाकडे वळवून ज्ञानाने समृध्द व्हावे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती सविता गोल्हार यांनी केले.
          जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, बीडच्या वतीने ग्रंथोत्सव 2017 चे आयोजन करण्यात आले होते. या ग्रंथोत्सवाचे 2017 चे त्यांच्या हस्ते फित कापून व दिपप्रज्वलनाने उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी सहाय्यक ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, शिक्षण विभागाचे बापुसाहेब हजारे, अनंतराव चाटे, म. दा. शहाणे मंठेकर, संदिप नेकडे प्र.जिल्हा ग्रंथालय अधिकारी दि.ना.काळे यांच्यासह जिल्हा ग्रंथालय संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
          पुढे बोलताना श्रीमती गोल्हार म्हणाल्या की, भारताच्या ग्रंथसंपदेमुळेच भारतीय संस्कृतीची संपूर्ण जगाला ओळख झाली असून आपली संस्कृती ही जगभर पोहोचली आहे. माणसाची वैचारिकता वाढविण्यासाठी शालेय जीवनात वाचन खूप महत्वाचे ठरते त्यामुळे विद्यार्थ्यांनी वाचनाची कास धरुन आपले ध्येय प्राप्त करावे. बीडकरांना ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून एक चांगली दोन दिवसीय संधी मिळाली आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.
          सहाय्यक ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर म्हणाले की, जिल्ह्यातील वाचनालयात विविध पुस्तकांची व ग्रंथाची खरेदी ग्रंथोत्सवातून करावी. तसेच वाचनालयात  जिल्ह्यातील मान्यवर साहित्यिकांचे साहित्य ठेवले पाहिजे यासाठी वेगळे दालन निर्माण करुन त्यांना वेगळे स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. जिल्ह्यातील साहित्यिकांचे  ग्रंथ आपल्या वाचनालयात ठेवल्यास आपल्या जिल्ह्याचा लौकिक वाढण्यास मदत होईल असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.यावेळी प्र.जिल्हा ग्रंथालय अधिकारी दि.ना.काळे यांनी ग्रंथोत्सावाबाबतची माहिती विषद करुन वाचक, साहित्य प्रेमीणा एकाच ठिकाणी आपल्या आवडीचे प्रुस्तके, साहित्य उपलब्ध व्हावे व वाचन संस्कृती वाढावी या ग्रंथोत्सवामागचा हेतू आहे असे त्यांनी आपल्या प्रस्ताविकात सांगितले.
          ग्रंथोत्साव 2017 ची सुरुवात ही ग्रंथदिडीने करण्यात आली. यामध्ये शालेय भजनी मंडळ, वाचक, विविध विभागाचे अधिकारी आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ही ग्रंथदिडी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन परिसरातून निघून छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे परत डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन परिसरात येऊन विसर्जीत करण्यात आली. या कार्यक्रमास वाचनालायाचे पदाधिकारी, कर्मचारी, वाचक, साहित्य प्रेमी, पत्रकार यांच्यासह शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या  प्रमाणात उपस्थित होते.

शनिवार दि.18 नोव्हेंबर 2017 रोजी  सकाळी 10.30 ते 1.00 वा. कालावधीत ग्रंथाने काय दिले या विषयावर म.सा.प चे सदस्य डॉ. सतिश साळूंके यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून या परिसंवादामध्ये कोषागार अधिकारी श्रीरंग भूतडा, दैनिक सकाळचे उपसंपादक अरविंद रेड्डी, प्रा. डॉ. सोपान सुरवसे,प्रा. श्रीधर ढास,अमर फफाळ यांचा सहभाग राहणार आहे. दुपारी 1.30 ते 2.30 वा. ग्रंथवाचक गौरव व ग्रंथोत्सव सहभाग  प्रमाणपत्र वाटप. दुपारी 2.30 ते 4.30 वा. या कालाधीत काव्य वाचनाचा कार्यक्रम होणार आहे.                                                       -*-*-*-*-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा