शुक्रवार, ७ ऑक्टोबर, २०१६

पिंपळवाडी परिसरातील नुकसानीचा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडून आढावा





बीड, दि. 7 :- पिंपळवाडी परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी तातडीने कारवाई करावी असे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले. पिंपळवाडी रिसरातील डोकेवाडी तलावाचा सांडवा फुटल्याने परिसरातील पीक, रस्ते, जलवाहिन्या आणि पशुधनाच्या झालेल्या नुकसानीचा आढावा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी प्रत्यक्ष भेट देऊन घेतला. यावेळी ते बोलत होते.
          यावेळी बीडचे उपविभागीय अधिकारी विकास माने, पाटोद्याचे उपविभागीय अधिकारी गणेश निऱ्हाळी, बीडच्या तहसीलदार छाया पवार यांची यावेळी उपस्थिती होती.
          यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले की, अतिवृष्टीमुळे पिंपळवाडी परिसरात झालेल्या नुकसानची संबंधितांना तातडीने भरपाई देण्यासाठी आता पंचनाम्याची आवश्यकता  नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनामार्फत नुकसानीचा अहवाल शासनास सादर केल्यानंतर तातडीने मदत उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी काळजी करण्याची काहीही कारण नसल्याचे सांगितले. तसेच अतिवृष्टीमुळे या परिसरातील विहीरी बुजून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसाचा स्वतंत्र अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

          यानंतर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आष्टी तालुक्यातील वाहिरा आणि सीना प्रकल्प येथे भेट दिली. मा. मुख्यमंत्री महोदयांच्या बीड जिल्हयातील संभाव्य दौऱ्याच्या अनुषंगाने येथे करण्यात येत असलेल्या हेलीपॅड, पार्कींग, रस्ते, विद्युत, वाहतुक व्यवस्था, मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणची सुरक्षा व्यवस्था आदीबाबत आढावा घेऊन सदरील कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी दिल्या. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, उपविभागीय अधिकारी गणेश निऱ्हाळी, जलसंधारण विभागाचे अभियंता श्री. पाचरणे, श्री. घारे, यांच्यासह, पोलीस, महावितरण, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा