शनिवार, ४ मार्च, २०१७

तातडीच्या आरोग्य सेवेसाठी 108 रुग्णवाहिकेचा वापर करावा - जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदिप सांगळे






माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्यावतीने नाळवंडी  येथे प्रजनन,माता-बालसंगोपन व किशोरवयीन मुलांचे आरोग्य जनजागृती अभियान संपन्न
तातडीच्या आरोग्य सेवेसाठी
108 रुग्णवाहिकेचा वापर करावा
                                                                           - जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदिप सांगळे

बीड, दि. 4:- अपघात, छातीत दुखणे, सर्पदंश,  गंभीर आजार रुग्णांना तात्काळ आणि जलद गतीने सेवा देण्यासाठी शासनाने बीड जिल्ह्यात 17 ठिकाणी आरोग्य रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या सुविधेचा तात्काळ लाभ घेण्यासाठी 108 हा क्रमांक डायल करुन अवघ्या 15 मिनिटांच्या आत रुग्‍णांना आरोग्य सेवा दिली जावून रुग्णांचे प्राण वाचवीले जातात अशी  माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदिप सांगळे यांनी दिली.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे क्षेत्रीय प्रचार संचालनालय व राज्य सरकारच्यावतीने बीड जिल्ह्यातल्या बीड तालुक्यातील नाळवंडी येथे दोन दिवसीय (दि.3 व 4 मार्च 2017) प्रजनन,माता-बाळ आरोग्य आणि किशोरवयीन मुलांचे आरोग्यजनजागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी जिल्हा साथरोग अधिकारी पुरुषोत्तम पिंगळे, जिल्हा आयुषअधिकारी डॉ.मिथून पवार, राष्ट्रीय किशोरी आरोग्य कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक डॉ.संतोष हरणमारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नरेश कासट, वैद्यकिय अधिकारी डॉ.मिर्झा बेग, संगमेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.के.राठोड,माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, आरोग्य  तसेच महिला बाल विकास विभागाचे कर्मचारी, आशा , अंगणवाडी कार्यकर्त्या  आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्ह्यात गरोदरपणा व बाळंतपणातील आजारामुळे दरवर्षी जवळपास 20 मातांचा मृत्यू होतो हा मृत्यू टाळण्यासाठी तीन आठवड्याच्या आत गरोदर मातेची नोंदणी करुन वेळेवर तपासण्या, निदान आणि उपचार करुन वेळेवर सकस आहार दिल्यास त्यानंतर प्रसुती रुग्णालयातच केल्यास मातेचा मृत्यू टाळता येतो असे ते म्हणाले. जिल्ह्यातील 56 ते 60 टक्के मुलींमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण असून यासाठी लोहयुक्त गोळ्या घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
डॉ.हरणमारे यांनी जंतामुळे भयंकर आजारांचा सामना करावा लागतो. त्यामुळे मुले  कुपोषित होऊन विविध आजारांना बळी पडतात. नियमित जंतनाशक गोळ्या घेणे, स्वच्छता राखणे आणि उघड्यावर शौचास न जाणे अशा उपाययोजना केल्या तर बालकांमधील आजार कमी होण्यास मदत होते असे ते यावेळी म्हणाले.
यावेळी सकस आहार, रांगोळी आणि सुदृढ बालक स्पर्धा तसेच प्रश्न मंजूषा घेऊन विजेत्या स्पर्धकांना पारितोषिकांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करणात आले. आज सकाळी नाळवंडी गावातून जनजागरण रॅली काढून आरोग्याचा संदेश देण्यात आला. यावेळी संगमेश्वर विद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक, आशा, अंगणवाडी कार्यकर्त्या  तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

कायर्क्रमाचे प्रस्ताविक क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये यांनी केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकार राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती देवून या कार्यक्रमाचा उद्देश विशद केला, कार्यक्रमाची सर्व जबाबदारी क्षेत्रीय प्रचार सहायक आलिम खान यांनी सांभाळली.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा