मंगळवार, १० जानेवारी, २०१७

रस्ता सुरक्षा नियमांचे पालन काटेकोरपणे करावे - जिल्हाधिकारी राम






            बीड, दि.10:- रस्ता सुरक्षा नियमांचे काटेकोर  पालन केल्यास  निश्चितच रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण कमी होईल व  मनुष्यहानी तसेच वित्तहानी टाळण्यास मदत होईल असे प्रतिपादन  जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.
             डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या सभागृहात जिल्हा रस्ता सुरक्षा समिती, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलीस विभाग आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखा बीड यांच्या संयुक्त विद्यमाने दि.9 जानेवारी ते 23 जानेवारी 2017 या कालावधीत आयोजित 28 व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा जनजागरण अभियान-2017 च्या उदघाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना  जिल्हाधिकारी नवल किशोर राम  बोलत होते.
            यावेळी अपर पोलिस अधीक्षक वैभव कुलबर्मे, औरंगाबाद विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष  वसंत मुंडे, पत्रकार महेश वाघमारे, गिरीष क्षीरसागर, नितीन गोपन, उपप्रादेशिक परीवहन अधिकारी ए.ए.खान, शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक सोपान निघोट  यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी  पुढे  बोलताना जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले की, रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी किंवा टाळण्यासाठी वाहतुकीचे नियम व कायदे पाळणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच  प्रत्येक नागरिकांनी वाहन चालवतांना  आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच जिवीत व वित्त हानी रोखण्यासाठी  नागरिकांनी स्वंय शिस्तीचे नियमन केले पाहिजे  आणि वाहन चालवतांना वाहन सुस्थितीत आहे का याची शहानिशा करणे आवश्यक असल्याचे सांगून नागरिकांने वाहन चालवतांना स्वत: बरोबरच इतरांची काळजी घेतली पाहीजे तसेच  अपघात टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना व घ्यावयाची दक्षता याबाबत सर्व माध्यमातून जनजागृती करणे आवश्यक असल्याचे सांगुन विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी या कामी पुढाकार घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
            यावेळी बोलताना औरंगाबाद विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष वसंत मुंडे म्हणाले की, रस्त्यावरील अपघातामध्ये जखमी अथवा मृत्युमुखी पडणाऱ्यामध्ये वाहतुकीच्या नियमाचे पालन न करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तसेच  शालेय विद्यार्थ्याबरोबरच नागरिकांनाही  वाहनांच्या नियमाचे व कायद्याचे मार्गदर्शन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी  पत्रकार महेश वाघमारे यांनीही  नागरिकांनी  व वाहन चालवतांना घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
            कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ए.ए.खान यांनी  दि.9 ते 23 जानेवारी दरम्यान रस्ता सुरक्षा अभियानामध्ये घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती देऊन या कालावधीत वाहतुकीचे कायद्याची जनजागृती होण्यासाठी जिल्हयात पथनाट्य, चित्रकला स्पर्धा, वाहनांना रिफ्लेक्टर लावणे,  शाळा, कॉलेजमध्ये वाहतुक विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन यासारखे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही सांगितले.
            प्रांरभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.  व  उत्कृष्ट काम करणाऱ्या वाहतुक शाखेच्या कर्मचाऱ्यांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी 28 व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा जनजागरण अभियान-2017  निमित्त तयार करण्यात आलेल्या माहितीपुस्तीका, स्टिकर्स, माहिती पत्रकांचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजेश देशमुख यांनी केले तर आभार युनुस सय्यद यांनी मानले. या कार्यक्रमास महामार्ग सहाय्यक पोलीस निरीक्षक  श्री पाटील, शहर वाहतूक  शाखेचे सहाय्यक पालीस निरीक्षक  प्रविणकुमार बांगर, मोटार वाहन निरीक्षक राजेंद्र निकम,  सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक राघवेंद्र पाटील, अमित मुंडे, अमोल आव्हाड,  कल्याण तांदळे, विजय जाधवर, यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थी, विद्यार्थींनी मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

            

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा