बीड,
दि. 5:- माहे ऑगस्ट 2017 करीता स्वस्त धान्य दुकानदारांनी धान्याची उचल ही पात्र लाभार्थींना
वाटप करणे अभिप्रेत होते. तसेच जिल्ह्यातील रास्त भाव धान्य दुकानदारांची सभा आयोजित
करण्यात आली होती. परंतू दि.1 ऑगस्ट 2017 पासून आजपर्यत सुरु असलेल्या संपामुळे परवानाधारकांनी
शिधावस्तुंची उचल आणि वाटप केली नाही. यामुळे पात्र लाभार्थी शिधावस्तुपासून वंचित
राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुकानदारांच्या संपातील सहभागामुळे जीवनावश्यक
वस्तू अधिनियम 1955 व अन्न सुरक्षा अधिनियम 2013 मधील तरतुदींचा भंग झाल्याने प्राथमिक
पातळीवर संपात सहभागी दुकानदारांपैकी बीड तालुक्यातील 149 स्वस्त धान्य दुकानदारांना
जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ.एन.आर.शेळके यांनी जीवनावश्यक अधिनियम 1955 चे कलम 3 व 7
अन्वये नोटीसा बजावल्या आहेत. इतर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना नोटीसा रवाना
केल्या असून सर्व तहसिलदारामार्फत नोटीसा बजावण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. यानंतरही
संप सुरु राहिल्यास सर्व तहसीलदारांना गावनिहाय अन्न धान्य वितरण करण्याकरीता आकस्मित
आराखडा तयार करण्याच्यासुचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात संप कालावधीमध्ये एकही
लाभार्थी अन्न धान्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामार्फत
घेण्यात येत आहे. असे बीडचे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा